कोरोनामुक्त अभियान प्रभावी राबवा ; आमदार विक्रमसिंह सांवत | जतेत आढावा बैठक
जत,संकेत टाइम्स : महाराष्ट्र शासनाच्या कोरोनामुक्त गाव अभियानात जास्तीतजास्त गावच्या ग्रामपंचायतीनी सहभाग घ्यावा.पाणी पुरवठ्याची व अन्य योजनांची थकीत वीज बिले तातडीने भरावीत.सोलर कृषी योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याचे आवाहन आमदार विक्रमसिंह सावंत यांनी केले.
जत येथील महसूल विभागाच्या सभागृहात आयोजित थकीत वीज बिले, कोरोनामुक्त गाव अभियान,सोलर कृषी योजना स्ट्रीट लाईट प्रस्ताव आदी विषयांच्या आढावा आमदार सावंत यांनी घेतला.त्यावेळी ते बोलत होते.यावेळी प्रांताधिकारी प्रशांत आवटे,तहसीलदार सचिन पाटील,गटविकास अधिकारी अरविंद धरणगुत्तीकर,तालुका
वैद्यकीय अधिकारी संजय बंडगर,जि. प.सदस्य सरदार पाटील,माजी सभापती बाबासाहेब कोडग,काँग्रेसचे कार्याध्यक्ष नाना शिंदे तसेच ग्रामसेवक, तलाठी,महावितरणचे अधिकारी उपस्थित होते.
यावेळी आमदार सावंत म्हणाले की, सध्या जत तालुक्यात म्हैसाळ योजनेचे पाणी काही भागात आले आहे.शिवाय काही ठिकाणी समाधानकारक पाऊस झाला आहे.मात्र वीज पुरवठा सुरळीत होत नसल्याने अडचणीचे ठरत आहे.यासाठी गावच्या पाणीपुरवठा
योजनेची,गावची दिवाबत्ती इतर थकीत वीज बिले तातडीने भरण्यासाठी अधिकाऱ्यांनी प्रयत्न करावेत.बुधवारी ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्याशी जत तालुक्यातील वीज प्रश्नाबाबत बैठक झाली. ऊर्जामंत्री राऊत यांनी जत तालुक्यासाठी 10 कोटी रुपयांचा
निधी देण्याचे आश्वासन दिले आहे. तसेच सोलर कृषी योजनेसाठी संबंधीत तलाठी,ग्रामसेवक यांनी वेळेत माहिती द्यावी. या कामात हलगर्जीपणा करू नये.तसेच कोरोनामुक्त गाव अभियानात भाग घेताना गावचे लसीकरण पूर्णपणे होण्यास प्राधान्य द्यावे.
प्रांताधिकारी प्रशांत आवटे म्हणाले की,सोलर कृषी योजनेअंतर्गत तालुक्यातील 60 गावात एकूण 1650 हेक्टर गायरान जमीन उपलब्ध आहे.एका सोलर योजनेसाठी 25 एकर क्षेत्राची आवश्यकता आहे. त्यानुसार गावकामगार तलाठी अशा क्षेत्रातील उतारे व इतर माहिती संबंधीत महावितरण अधिकाऱ्यांना देतील.त्यांनी तो प्रस्ताव जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयाकडे पाठवावा.कोरोनामुक्त गाव अभियानात काही अडचणी असतील तर त्या प्रशासनाला कळवणे आवश्यक आहे.