नियम शिथिल होताच जतेत गर्दी वाढली | पुन्हा बेपर्वाही धोक्याला आमंत्रण | पोलीस,नगरपरिषदेकडून कडक कारवाईची गरज
जत,संकेत टाइम्स : जत येथिल पोलीस प्रशासन व नगरपरिषद यांच्याकडून जिल्हाधिकारी यांच्या आदेशाची पायमल्ली करत शहरात अत्यावश्यक सेवा वगळता बहुतांशी दुकाने सुरू झाल्याने धोका वाढला आहे.
जत शहरासह तालुक्यात कोरोना पाॅझीटीव्ह रूग्णांची संख्या काही प्रमाणात आटोक्यात येत असतानाच जिल्हा प्रशासनाने नागरिकांची गैरसोय होऊ नये.यासाठी सकाळी सात ते दुपारी अकरा वाजेपर्यंत किराणा दुकान, बेकरी, शेती उपयोगी साहीत्य, कृषी सेवा केंद्रे, चिकण,मटण,व मासे विक्रीची दुकाने सुरू करण्यासाठी परवानगी दिली आहे.
जिल्हा प्रशासनाने हे आदेश देत असतानाच सामाजिक अंतर, व कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन या अटी घातल्या होत्या.परंतु जत शहरात दुसऱ्या दिवशीच नियमाचा फज्जा उडाला आहे. बुधवारी शहरातील प्रमुख बाजारपेठेत, वित्तीय संस्थांमध्ये नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून आला.
जत शहरासह तालुक्यात मोठ्या प्रमाणात कोरोना रूग्ण आढळून येत आहेत.त्यातच कोरोनाने मृत्यु होणारे रूग्ण ही वाढतच आहेत.असे असताना जत शहरातील ही गर्दी पाहून असे वाटायला लागले आहे की, जत शहरात कोरोना नाहीच अशा रितीने नागरिक वागत आहेत.शहरासह तालुक्यातील कोरोनाची परिस्थिती आता कुठे आटोक्यात येऊ लागली असताना जत पोलीस प्रशासन व जत नगरपरिषद याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करताना दिसत आहे.
चौकाचौकात पोलीस बंदोबस्त असतानाही शहरातून मास्क न लावता टुव्हीलर व फोर व्हीलर वाहनातून बिनकामाचे फिरणारे व्यक्तीवर पोलीस प्रशासन कारवाई करताना दिसत नाही. त्याचप्रमाणे अत्यावश्यक सेवेत नसलेली व दुपारी अकरा वाजेपर्यंत वेळेची मर्यादा दिलेली दुकाने व अस्थापना या वेळेनंतरही सुरूच असल्याचे दिसून येत होते.अशीच परिस्थिती शहरात सुरू राहीली तर येणारे काळात जत शहर हे कोरोनाचे मोठे हाॅटस्पाॅट झाल्याशिवाय राहणार नाही. यासाठी जिल्हाधिकारी यांनी प्रशासनाचे आदेश न पाळणारे जत नगरपरिषद व पोलीस प्रशासन यांच्यावर कारवाई करावी अशी अपेक्षा जत शहरवासियांकडून करण्यात येत आहे.
जत येथील स्टेट बॅंक ऑफ इंडिया या ठिकाणी बुधवारी झालेली ग्राहकांची मोठी गर्दीमुळे सोशल डिस्टन्सिंगचा बोजवारा उडालेला होता.