अखेर आरोग्य विभाग ताळ्यावर | जत शहराला रविवारी 450 डोस
जत,संकेत टाइम्स : जत शहरात कोरोना काळात संजीवनी ठरलेल्या लसीचा तुटवडा करून जनतेवर अन्याय करणाऱ्या जिल्हा परिषद, आरोग्य विभागा विरोधात रिपाइंचे जिल्हाध्यक्ष संजय कांबळे आक्रमक झाल्यानंतर अखेर प्रशासन ताळ्यावर आले असून जत शहरासाठी रविवारी 450 लसीचे डोस उपलब्ध करून देण्यात आले.
जत तालुक्यात कोरोनाचा मोठा फटका बसलेला असतानाही जिल्हा प्रशासनाकडून गांर्भिर्य घेतले जात नव्हते.
जत तालुक्यात लसीकरणास प्रतिसाद मिळत नाही म्हणून एक लाखाच्या आसपास लोकसंख्या असणाऱ्या जत शहरात दररोज फक्त 50 लसीचे डोस देऊन एक प्रकारे थट्टा केली जात होती.
शनिवारी शहरातील कोरोना लसीकरण केंद्रावर दोनशेवर नागरिक सकाळ पासून रांग लावून उभे होते.तेथे तब्बल दोन तास एकही कर्मचारी,अथवा डॉक्टर फिरकला नव्हता.मोठी गर्दी बघून रिपाइंचे जिल्हाध्यक्ष संजय कांबळे यांनी तेथे जाऊन परिस्थिती जाणून घेतल्यानंतर सत्य समोर आले होते.
संतप्त झालेले कांबळे यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुंडी,जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.विवेक पाटील,ग्रामीण रुग्णालयाचे डॉ.मोहिते यांना चांगलेच सुनावत आम्हच्या संयमाचा अंत पाहू नका,मागणीप्रमाणे लसी पुरवा अन्यथा जिल्हा परिषदेला टाळू ठोकू असा इशारा दिला होता.अखेर रिपाइंच्या दणक्याचा इफेक्ट दुसऱ्या दिवशी दिसून आला शहरात तब्बल 450 लसीचे डोस उपलब्ध करून देण्यात आले आहेत, यांचा शहरातील नागरिकांनी लाभ घ्यावा,असे आवाहन कांबळे यांनी केले आहे.