आदिवासी क्रांतीकारक जननायक बिरसा मुंडा
१५ नोव्हेंबर रोजी जननायक बिरसा मुंडा यांची जयंती.आपणा सर्वांना भगतसिंग,राजगुरू सुखदेव चंद्रशेखर आजाद यांचा इतिहास माहीत आहे पण आपल्यासारखे आपल्यापैकी किती जण बिरसा मुंडा यांचा इतिहास जाणतात चला आज क्रांतिसूर्य बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त त्यांचा इतिहास जाणून घेण्याचा प्रयत्न करू
आदिवासी जननायक बिरसा मुंडा यांचा जन्म १५ नोव्हेंबर १८७५ मध्ये सध्याच्या झारखंड राज्याच्या रांची जिल्ह्यातील गावामध्ये एका झोपडपट्टीत झाला. त्यांच्या आईचे नाव करमी व वडिलांचे नाव सुगना मुंडा असे होते. शिक्षण बिरसा लहानपणापासून खूप कुशाग्र बुद्धीचे व चपळ होते.
प्रार्थमिक शिक्षण सलगा या गावातील त्यांच्या मावशीकडे झाले. पुढे ते मिशनरी शाळेत चाईसाबा येथीलजी.सी.एल. मिडल स्कूल मधून त्यांनी उच्च माध्यमिक परीक्षा पास केली. त्यांना तेथे मिशनऱ्यांच्या दुष्टचक्रा बद्दलचा पहिला अनुभव आला मिशनरी आदिवासींचे शोषण करतात म्हणून त्यांनी मिशनरी शाळा सोडून दिली. आणि त्यांचे शिक्षण अर्धवट राहिले. विवाह त्यानंतर १८९० ते १८९४ पर्यंत ते बंद्राव येथेच राहिले. पुढे त्यांचा विवाह हिराबाई नावाच्या कन्येशी झाला. परंतु दुर्दैवाने लवकरच त्यांच्या पत्नीचा मृत्यू झाला. बिरसा मुंडा ते भगवान बिरसा बिरसांना शिक्षणाबरोबरच संगीत,नृत्य यांचीसुद्धा आवड होती. ते उत्तम बासरी वाजवायचे.त्यांचा आवाज भारदस्त होता. पुढे हाच आवाज आदिवासींच्या अन्यायाविरुद्ध उठला. ते रानात गुरे चारायला नेत. त्यामुळे निसर्गात उपलब्ध असलेल्या वनौषधी बद्दल त्यांना चांगलेच ज्ञान होते.
ते आजारग्रस्त लोकांना विशिष्ट प्रकारची जडीबुटी देऊन त्यांचा आजार बरा करत असत म्हणून लोक त्यांना भगवान बिरसा म्हणू लागले. एकदा पावसाळ्यात कडाडती वीज बिरसांवर पडली. परंतु त्यांना कसलीही इजा झाली नाही उलट त्यांच्या आजूबाजूची झाडे विजेमुळे जळून खाक झाली . या घटनेपासून इंग्रजही आश्चर्यचकित झाले.व बिरसा सेव है असे ते मानू लागले.व तसे नमूदहि करून ठेवले आहे.बिरसाचे कार्य सावकार व ठेकेदारांनी आदिवासींच्या शोषणाची सीमापार केली होती. जमिनीचे मूळ मालक असूनही जमीनदार व सावकार जबरदस्तीने त्या जमिनीवर ताबा मिळवून बसले होते. पण त्याबद्दल चकार शब्दही न करण्याचा आदेश इंग्रजांनी दिले होते. परंतु बिरसाना ते सहन झाले नाही बिरसानी लोकांमध्ये जागृती करण्यास सुरुवात केली. ते लोकांना म्हणत, “तुमच्या जमिनी धूळ वार्यासारख्या उडून गेल्या आहेत. स्वाभिमाना सोबत तुमचा आत्मविश्वासही संपला आहे. जर तुम्ही तुमचा आत्मविश्वास परत जागृत नाही केला तर तुम्ही तुमच्या आयाबहिणींची अब्रू कशी वाचवाल ?”या वाक्यांचा मनावर खोल परिणाम झाला व लोकांमध्ये आत्मविश्वास जागृत होण्यास सुरवात झाली. उलगुलान उलगुलान म्हणजे एकाच वेळी सर्वांगीन उठाव.सन १८६९ मध्ये वनसंरक्षण कायदा लागू करण्यात आला.
तो काळ पारतंत्र्याचा होता संपूर्ण देशाला इंग्रजांनी गुलाम बनवून ठेवले होते. जंगलात राहणारे आदिवासी ही या गुलामगिरीतून वाचले नव्हते. इंग्रजांनी वन कायदा करून आदिवासींचा जंगलावरचा पारंपारिक अधिकार नाकारला होता. त्यामुळे आदिवासींमध्ये इंग्रजांच्या विरुद्ध असंतोष निर्माण झाला होता.त्यांची जंगलांवर होणारी उपजीविका बंद झाली. आदिवासींवर मोठे संकट उभे राहिले.या अन्यायाविरुद्ध बिरसांनी १८९० मध्ये व्यापक क्रांती उलगुलान ची घोषणा केली. शस्त्रबळ तयार करून शत्रूंना ठार केले.सन १८७५ मध्ये स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच ही टिळकांची घोषणा देशभरात पोहोचली पण नव्हती. त्याही आधीपासून बिरसांनी स्वराज्याची घोषणा करून इंग्रजी सत्तेला आव्हान दिले होते. हे इतिहासातील विदारक सत्य किती जणांना माहित आहे?
बिरसांनी १८९५ मध्ये समाजसुधारणेचे अभियान आपल्या हातात घेतली. जंगल जमीन संपत्ती हा आमचा अधिकार आहे.
आमच्या उपजीविकेचे साधन आहे. यासाठी सर्व आदीवाशीनी एकत्र येऊन लढण्याचे आव्हान केले. त्यांनी न्याय व अधिकारासाठी शस्त्र हाती घेतले. जंगल राज्याची घोषणा करून ते आदिवासींचे महानायक बनले. इ.स.१८९४ साली बिहार मध्ये भीषण दुष्काळ पडला. उपासमार व रोगराईत अनेक लोक मरण पावले.तशातच ब्रिटिशांनी जमीनदार व जहागीरदारांकरवी शेतकऱ्यांवर अवाजवी शेतसारा लावला होता. याविरुद्ध बिरसाने वेळोवेळी जन आंदोलन केले.यामुळे इंग्रज सरकार त्यांच्या मागे लागले परंतु त्यांनी आपले कार्य चालूच ठेवले.बिरसांनी अनेक अनुयायी तयार केले.बिरसा व त्याच्या अनुयायांनी सावकार व जमिनदारांच्या घरांना आगी लावून दिल्या.ही बातमी पोलिसांनी जिल्हाधिकाऱ्याला कळवताच बिरसांना अटक करण्याचे आदेश देण्यात आले. ९ ऑगस्ट १८९५ ला बिरसा व त्यांच्या वडिलांना ही ताब्यात घेण्यात आले. आणि ख्रिस्ती पाद्री च्या साक्षीवरून त्यांना दोन वर्ष कारावास व पन्नास रुपये दंड ठोठावण्यात आला.त्यांना हजारीबाग तुरुंगात डांबण्यात आले. याच तुरुंगात बिरसाने इंग्रजी सत्ता मुळासकट उखडून टाकण्याचा संकल्प केला आणि आदिवासींच्या आर्थिक व सामाजिक स्वातंत्र्यासाठी इंग्जांविरूध्द उलगूलान पुकारला. उलगुलान म्हणजे एकाच वेळी सर्वांगीण उठाव ३० नोव्हेंबर १८९७ रोजी बिरसा तुरुंगातून बाहेर आले.
आदिवासी समाजाची केविलवाणी स्थिती बघून ते पेटून उठले व त्यांनी स्वावलंबन व स्वाभिमानासाठी उलगुलानची घोषणा केली.
इ.सन. १८९७ नंतर बिरसा मुंडा यांच्या नेतृत्वाखाली आदिवासींनी आपल्या पारंपरिक शस्त्रास्त्राने अनेक लढाया केल्या ब्रिटिशांना जेरीस आणले परंतु ब्रिटिशांच्या आधुनिक शस्त्र पुढे मोठ्या सेनेपुढे आदिवासी क्रांतिकारकांचा टिकाव लागू शकला नाही.इ.स.१८९८ मध्ये एका नदीकाठी झालेल्या लढाईत सुमारे ४०० आदिवासी क्रांतिकारक शहीद झाले. आपल्या पंचवीस वर्षाच्या आयुष्यात बिरसा मुंडा यांनी आदिवासी समाजाच्या शोषणाचे मूळ परकीय राजकीय व्यवस्थेत आहे हे ओळखले. त्याविरुद्ध आदिवासी समाजाला संघटित केले. ब्रिटिश सत्तेविरुद्ध वेळोवेळी लढे पुकारले. त्याचबरोबर आदिवासीचे आर्थिक शोषण करणाऱ्या जमीनदार जहागीरदार यांच्याविरोधातही बंड पुकारले. त्यामुळेच आजही आदिवासी समाज बिरसा मुंडा यांना आपला नेता मानतो. त्यांच्या कार्यामुळे त्यांना स्वातंत्र्याच्या इतिहासात महत्त्वाचे स्थान आहे.
बिरसा हे उत्तम योद्धा होते. एक कुशल प्रशासक होते. फेब्रुवारी १८९८ मध्ये बिरसांनी आपल्या अनुयायांच्या सोबत डुंबारी या पर्वताच्या पायथ्याशी सभा बोलावली, व १८९९ मध्ये नाताळचा पहिलाच दिवस हल्ल्याचा दिवस म्हणून ठरवला.हल्यामध्ये त्यांनी पोलीस चौकी लुटायचे ठरवले.
नाताळच्या रात्री आपल्या साथीदारांच्या तीन वेगवेगळ्या तुकड्या बनवून वेगवेगळ्या जागेवर हल्ले चढवले.फादरच्या घरावर हल्ले करून फादर कारवेरी व फादर हाफमान यांच्यावर बाण चालवले. जानेवारी १९०० मध्ये रांचीच्या इंग्रज अधिकार्यांना बिरसांच्या या हल्ल्याची माहिती मिळाली आणि जानेवारी १९०० मध्ये अकरा वाजता इंग्रजांनी डुंबारी बुरुजावर गोळीबार सुरु केला. तेव्हाच बिरासांचे अनुयायी त्यांच्या नावाचा जयजयकार करत धनुष्यबाण व दगडफेक करत त्यांचा प्रतिकार करण्यास सुरुवात केली, त्यावेळी टेकडीवर दोन हजार पेक्षा जास्त लोकांचा जमाव उपस्थित होता. यात स्त्रिया व लहान मुलांचाही समावेश होता.या नरसंहारात २०० पेक्षा जास्त आदिवासी मारले गेले व बाकीच्यांना जबरदस्तीने ख्रिस्ती धर्म स्विकारण्यास भाग पाडले गेले. हा नरसंहार डुंबारी बुरूज नरसंहार’ म्हणून ओळखला जाऊ लागला. या नरसंहारानंतर सन १९०० मध्ये बिरसा मुंडा पहाडांमध्ये आदिवासी जनतेस मार्गदर्शन करत असताना ब्रिटीश सैन्याने अचानक हल्ला चढवला. त्याठिकाणी भीषण लढाई झाली. बिरसांना पकडल्यानंतर उपस्थित आदिवासी बांधवांना बिरासांनी माधारी फिरण्यास व आपल्या अधिकारांसाठी लढण्याचा उपदेश केला. बिरसा मुंडांना चक्रधरपूर येथे बंदी बनवून रांची येथील कारागृहात त्यांची रवानगी करण्यात आली. तुरूंगात त्यांच्यावर अनन्वित अत्याचार करण्यात आले. वयाच्या केवळ २५ व्या वर्षी तुरूंगवास भोगत असताना कॉलराने ग्रस्त होऊन बिरसाची ९ जून १९०० रोजी प्राणज्योत मालवली. त्यांना तुरुंगातच वीरगती प्राप्त झाली.परंतु येथेही इंग्रजांचे कपट दिसून येते.बिरसांच्या अनुयायांच्या म्हणण्यानुसार बिरसांना तुरुंगात कॉलरच्या औषधाऐवजी विष देण्यात आले होते. भारतीय स्वातंत्र्याच्या इतिहासात बिरसा मुंडा हे नाव अमर झाले. या वीराने आदिवासींच्या न्याय हक्कासाठी मोठा लढा दिला. त्यामुळे लोकांनी त्यांना जननायक हा किताब बहाल केला.
त्यांना खात्री होती की त्यांनी सुरुवात केलेल्या उलगुलान नावाच्या वादळाचा कधीच अंत होणार नाही. बिरसा अमर आहेत. आपल्यासाठी आणि येणाऱ्या अनेक पिढ्यांसाठी आदर्श आहेत.बिरसांच्या “उलगुलान” लाही बिरसाइतकेच महत्त्व प्राप्त झाले.उलगुलान मध्ये समाजहित तसेच मातृभूमीच्या रक्षणासाठी लढणे आदि तत्त्वे समाविष्ट आहेत. म्हणूनच लोक बिरसांना धरती आबा म्हणून संबोधतात. आजही या महानव्याक्तीच्या पवित्र स्मृती झारखंड राज्यात आहेत. झारखंड राज्याने रांची एअरपोर्ट व रेल्वे स्थानकाला बिरसा मुंडा हे नाव देऊन त्यांच्या महान कार्याला गौरविले आहे.
संदर्भ -आदीवासी वीर – जेलसिंग पावरा.
लेखक – शंकर नामदेव गच्चे जि.प.प्रा.शा. वायवाडी केंद्र पोटा बु!! ता. हिमायतनगर जि. नांदेड
मोबाईल नंबर -८२७५३९०४१०