पंढरपुरात चंद्रभागा नदीकिनारी घाटाची भिंत कोसळून 6 जणांचा मृत्यू
पंढरपूर : चंद्रभागा तीरावर असलेल्या कुंभार घाटाची भींत कोसळून 6 जणांचा मृत्यू झाला आहे. रात्रभर मुसळधार पावसाने कुंभार घाटावरील नवीन घाटाचे बांधकाम कोसळल्याने ही दुर्घटना घडली. अग्निशमन दल व आपत्कालीन यंत्रणेने हे सर्व सहा मृतदेह दगड ढिगाऱ्याखालून बाजूला काढले आहेत. ठेकेदारावर गुन्हा दाखल केल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नसल्याची भूमिका पंढरपूर येथील कोळी समाजाने घेतली आहे.
पंढरपुरातील चंद्रभागा नदीच्या काठावर नवीन घाट बांधून सुशोभीकरणाचे काम सुरू आहे. जलसंपदा विभागाकडून हे घाट बांधणीचे काम मागील दोन वर्षांपासून सुरू आहे. घाटाचे हे बांधकाम तिथेच राहणाऱ्या काही लोकांच्या अंगावर कोसळले. यामध्ये आत्तापर्यंत सहा जणांचे मृतदेह मिळाले आहेत.
हे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे होत असल्याबाबत माजी नगरसेवक रमेश कांबळे यांनी काही दिवसांपूर्वी उपोषण करूनही प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले होते. या ठेकेदारावर गुन्हा दाखल न केल्यास मृतदेह ताब्यात न घेण्याची भूमिका कोळी समाजाने घेतली आहे.
कुंभार घाट येथील दुर्घटनेत मृत्यू पावलेल्या कुटुंबियांना शासनाकडून मदत देणार याशिवाय या बांधकामातील ठेकेदाराच्या कामाची चौकशी करून दोषी असेल तर कारवाई करणार असल्याची घोषणा पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केली आहे.